Sunday, January 1, 2017

चांदवड शहर एक दृष्टीक्षेप




समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश वर स्थित आहे .


                   राष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र याची उपराजधानी असलेले ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास ह्याची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठयांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणार्र्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकरांचा पदस्पर्श लाभलेले ‘चांदवड’ हे खरोखर ‘इतिहासाचे साक्षी’ आहे.

    चांदवड हे शहर अनेक शतकांचा वारसा लाभलेल्या देशभरातल्या निवडक शहरांपैकी एक आहे. म्हणुन येथे ९ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या काळातील इंद्रायणी किल्ला(इंद्राई), चंद्रहास राजवटीची साक्ष देणारा चांदवडचा किल्ला (चंद्राई), होळकरकालीन टाकसाळ, १८ व्या शतकाच्या वास्तुकलेचा नमुना असणारा रंगमहाल, आदि वारसास्थळे इतिहासाची आठवण करून देतांनाच अंगावर शहारे येतात.

चांदवडचा महिमा वाढवणाऱ्या कार्यात ऋषी अगस्थी, महर्षी मार्कंडेय, उज्जैनाधिपती राजा विक्रमादित्य, या व अशा कित्येक महामनांच्या उपस्थितीचा ठसा उमटलेला आहे.

          ह्या जोडीलाच शहरात असणारी प्राचीन शिल्पकलेची साक्ष पटवून देणारी बांधकामे, प्राचीन शिलालेख, मंदिरे, ऐतिहासिक लढायांच्या खुणा मिरविणारे भग्न वाडे, पुरातन वास्तू, इ.
    राष्ट्रकुट राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने पारोळा (जि.जळगाव) येथे आपल्या राजधानीचे शहर वसविले होते. पुढे इ.स. ११६७ साली क्षत्रप राजा नहपान ह्याचा सोबतच्या तहांतर्गत क्षत्रपांचा चांदवड परगणा राष्ट्रकुटांना प्राप्त झाला. तेव्हा चांदवड हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने त्याचे व्यापारी व येथून घाटावर नजर ठेवणे सोईचे असल्याने त्याचे सामरिक महत्व जाणून राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने चांदवडला आपले प्रमुख लष्करी केंद्र व उपराजधानीचे शहर म्हणून निवडले.
    ह्याच काळात येथे विविध देवतांची स्थापना करत तब्बल २०० हून अधिक मंदिरे उभारण्याचा आपला निश्चय राजा शेऊणचंद्राने पूर्ण केला. त्याबद्दल श्रीक्षेत्र चंद्रेश्वर येथे जी ५२ विविध मंदिरे होती, ती शेऊणचंद्राने वसविलीत का? हा यक्षप्रश्न आजही इतिहासकारांना अनुत्तरीत आहे.
    आजही तालुक्यात बर्र्याच ठिकाणी रहस्यमय वाटणारे कितीतरी मंदिरे पहावयास मिळतात. जसे, पाताळेश्वर महादेव जो गणूररोडवर एका विहिरीत विराजमान आहे. खरंच का तो पाताळेश्वर आहे?
    इ.स. ९-१० व्या शतकातील यादव राजा पन्नार ह्याची राजधानी चंद्रदिव्यापुराम् असावे. ह्याच कालावधीत येथे तेली समाजाचे प्राबल्य दिसून येते. त्याकाळी चांदवडला ४०० हून अधिक तेलाची घाणी होत्या. शनिमहात्म्यात वर्णिल्याप्रमाणे राजा विक्रमादित्य साढेसातीच्या काळात चांदवड तालुक्यतील श्रीक्षेत्र वर्दडी येथे एका व्यापार्र्याच्या घाण्यावर देखरेख करू लागला. नंतर याच गावात शनी देवाने त्याला दर्शन दिले व साडेसातीतून मुक्त केले.
    रामायणकाळात अगस्ती ऋषींचे येथे वास्तव्य झाले राजा विक्रमादित्य येथे असतांना ‘चांदवडची फणी’ प्रसिद्ध होती. तिचे वेगळेपण म्हणजे ती संपूर्ण लाकडाची असुन त्यात तेल टाकण्यासाठी खाच केली होती. सोबतच येथील ‘बूट’ हे देखील फार प्रसिद्ध होते. कारण चालतांना त्यातून ‘बासरीची धून’ ऐकु यायची. गावातील साळी व क्षत्रिय समाजातील कारागीर हातमागावर आपली कला दाखवत. चांदवडची अंजीर, खवा, पेढे, प्रसिद्ध होते.

१४व्या शतकात दिल्लीची सुलतानशाही संपल्यावर चांदवड बहामनी राजवटीत गेले.
१५८०च्या काळात चांदवड मोगली राजवटीचा भाग बनले.
१६०५च्या मराठा-मोगली युद्धात चांदोरचा (चांदवडचा) ताबा मराठयांना मिळाला.
१६३५ साली मुघल शाहजादा अकबर (२रा) याने चांदोरचा परगणा जिंकला.
१६४०ला शरिफजी भोसला (शहाजीराजांचा लहान भाऊ व आदिलशाही सुभेदार) नाशिकचा सुभेदार झाला व चांदोर किल्ल्यात २ आठवडे राहिला.
१६६५ मध्ये चांदोर ‘जाफराबाद’ झाला.
१७४० साली चांदोरचा किल्ला सर करून संताजी व धनाजीने पेशवा बाजीराव बल्लाळची शाबासकी मिळवली.
देशमुखांच्या वाड्यात आता मल्हारराव राहू लागल्यावर तो १५५०-५६ काळात दुरूस्ती करून ‘रंगमहाल’ झाला. १७६८पर्यत मल्हारराव यांनी एकछत्री राज्य केले.
१७६८-९५ अहिल्यादेवींनी मुलगा मालेराव आणि पुतण्या तुकोजीराव यांच्या मदतीने राज्य सांभाळले.
    १८०४ मध्ये कर्नल वॅलेसने चांदवडचा ताबा घेतला.   
१८०९ला इंदोरच्या फौजांनी इंग्रजाची दाणादाण उडवून चांदवडचा ताबा घेतला.
    १८१८मध्ये थॅमस हिस्लापने चांदवडचा परिसर जिंकला.
१० एप्रिल १८१८मध्ये मराठासेनेने चांदवडवर हल्ला केला. पण ब्रिटीश लेफ्टनंट कर्नल मॅक्झ्वेलने हा हल्ला परतवला.
    १८२० पासून इंग्रजानी धुळे- चांदवड मार्गावर  चौक्या बसवून करवसुली सुरु केली.
    १८५७च्या उठावात २६व्या मराठा तुकडीने चांदवड शहर ताब्यात घेतले. पण १८५९च्या फितुरीने चांदवड शहर इंग्रजाकडे गेले ते १९४७मध्ये स्वतंत्र भारतातच मुक्त झाले.

      आज चांदवड शहरात नगरपालिका असून अनेक बदल घडताहेत. भलेही रंगमहालचा विकास होत आहे पण इतर पुरातन वास्तू आजही उपेक्षित आहेत. त्या नष्ट होण्यापूर्वी एकदा अवश्य भेट द्या ह्या चांदवड शहराला........  


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.